Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरेंच्या वक्तव्याने धाकधूक वाढली, पण उद्धव ठाकरेंनी प्लॅन सांगितला, शिवसेना-मनसे युतीचं गाडं कधी पुढे सरकणार?

Maharashtra Politics: ठाकरेंच्या युतीचा सस्पेन्स कायम, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही? उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला असला तरी आता राज ठाकरे सावधपणे पावलं टाकत आहेत.
Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र आल्यावर आता मनसे (MNS) आणि शिवसेना युतीचे वारे वाहात आहेत. उद्धव ठाकरे यांनी याबाबत आता अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य केलंय. मनसेशी युतीबाब सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय अशी सूत्रांची माहिती आहे. युतीबाबत सध्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटलंय. मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांकडून प्रयत्न झाले, यापुढेही होतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणुका जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय होईल, असं उद्धव ठाकरे या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले अशी सूत्रांची माहिती आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं बोलत असले तरी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सावध पवित्रा घेतलाय. नोव्हेंबर डिसेंबरदरम्यान चित्र स्पष्ट होईल त्यानंतर युतीसंदर्भात बघू असं राज यांनी इगतपुरी इथे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय. विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर युतीसंदर्भात बघू, असे राज ठाकरे म्हणाले. एकूण ठाकरेंची शिवसेना युतीबाबत टाळी देत असताना राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतलाय.
आतापर्यंत आम्ही एकट्यानेच निवडणूक लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले होते. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, 5 जुलैला आम्ही एकत्र आलो होतो स्पष्टपणे ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. निवडणुकांचं वातावरण दिसत आहे. आमच्या बाजूने जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करु असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.