Pratap Sarnaik Letter To Eknath Shinde: राज ठाकरे बडव्यांना शरण गेले…; प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र, मनातलं सगळं बोलले!

Pratap Sarnaik Letter To Eknath Shinde: मुंबईतील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर परिवहन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे.
Pratap Sarnaik Letter To Eknath Shinde: ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. तसेच या विजयी मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. त्यानंतर मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे.
आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरु आहे आणि आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या , आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राज्यात सुरू आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत उंचीवर जात आहे. पण आपल्या राज्यात , गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करुन स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे , त्यामुळे या पत्रातून मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या, असं प्रताप सरनाईक एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्राद्वारे म्हणाले.
प्रति,
माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब
शिवसेना मुख्य नेते
उप मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
जय महाराष्ट्र !
आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरु आहे आणि आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या , आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राज्यात सुरू आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत उंचीवर जात आहे. पण आपल्या राज्यात , गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करुन स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे , त्यामुळे या पत्रातून मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या.
मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असे उबाठा गट , मनसे सांगत आहेत. मग काही वर्षांपूर्वी हे लोक वेगळे कोणाच्या हितासाठी झाले होते? मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्याविषयी त्यांना काडीचे प्रेम नाही, केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत हे सुज्ञ जनता ओळखून आहे. राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक लोककथा मराठीत आहे. यांचा जीव महापालिकेत अडकलेला आहे. महापालिकेच्या तिजोरीत यांचा आत्मा आहे. शनिवारी वरळी येथे झालेल्या मेळाव्यात सुध्दा त्यांचा स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडाच पहायला मिळाला. सत्ता गेल्यामुळे ते किती अगतीक झाले आहेत याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला पदोपदी येत आहे. उबाठाचे राजकारण अत्यंत खोटारडे, स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे. त्यामुळेच त्यांचा एक एक सहकारी त्यामुळेच त्यांना सोडून जात आहे.
‘मराठी’ची टोपी घालून, अनेक वर्षे ऊबाठा गटाने मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली. परंतु त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले. त्यांच्या या टोपीखाली दडलंय काय ? तर केवळ स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा दडलेला आहे. कोविड रुग्णांची खिचडी खाऊन गब्बर झालेली ही मंडळी मिठी नदीतील भ्रष्टाचाराच्या गाळात हे खोलवर अडकून पडली आहेत. मराठी भाषेचे कैवारी किंवा ठेकेदार असल्याचा आव आणणारांनी मराठीचे जेवढे नुकसान केले तेवढे कुणीच केले नसेल. गेली अनेक वर्षे फक्त भाषेच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्यांनी “मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करणार”, “मुंबई तोडण्याचा डाव” असा अपप्रचार करून वर्षानुवर्षे लोकांची मते लाटली. प्रत्यक्षात मुंबईचा नाही तर फक्त स्वतःचाच विकास ‘उबाठा’ने केला. मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याची हिंमत कोणीच करणार नाही हे यांना चांगलेच माहिती आहे, परतुं तरीही ते दरवेळी बागुबलबुवा उभा करतात. ‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’ असा हा प्रकार आहे. लोकांना खोटी भीती दाखवयाची आणि स्वतः ‘गब्बर’ होऊन ‘गबर’ व्हायचे, असे यांचे धोरण आहे.
आयुष्यभर मराठीवर राजकारण करणारे हे नेते मुंबईत एवढी वर्षे सत्ता असून मराठी शाळा वाचवू शकले नाहीत. उलट उबाठाच्या काळात महापालिकेच्या मराठी शाळांचे रूपांतर इंग्रजी शाळांमध्ये करण्यात आले आणि मराठीला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. “दुकानांवरच्या पाट्या मराठीत लावाव्यात” म्हणून आंदोलन करणा-यांच्या मुलांच्या साखरपुड्याच्या-लग्नाच्या आमंत्रण पत्रिका इंग्रजीत छापल्या जातात हे सगळ्यांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. मुंबईतील ‘गिरणी कामगार’ देशोधडीला लागला…तो कोणामुळे ? मराठी माणुस मुंबई सोडुन विरार, नालासोपारा, बदलापुरला शिफ्ट झाला, तो कोणामुळे ? मताची भीक मागण्यासाठी इतर भाषिकांचे मेळावे कोणी घेतले ? तिसरी भाषा शिकविण्याचा प्रस्ताव कोणाच्या सत्तेच्या काळात आला हेही लोक जाणून आहेत. मराठी माणसाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी , मराठीचा झेंडा चहू दिशांनी फडकावा असे आपल्याला प्रत्येकाला वाटते. पण उबाठाचे पक्षावर एक हाती वर्चस्व असतानाच मुंबईतील हॉटेल इंडस्ट्री, बांधकाम व्यवसाय , सोन्या चांदीची दुकाने यासह प्रत्येक क्षेत्रात , उद्योग व्यवसायातून मराठी माणूस हद्दपार होत गेला. भाषेचे राजकारण करणाऱ्यांनी लोकांच्या विकासाचा विचार कधीच केला नाही. चाकरमानी हे आपले चाकर आहेत अशाच भ्रमात ते राहिले. अनेक वर्षे उबाठाची सत्ता महापालिकेत होती, तेव्हा त्यांनी यासाठी काय केले ? यावर एक ‘पश्चाताप मेळावा’ घेऊन ‘उबाठा’ने जनतेला माहिती दिली पाहिजे.
‘मराठीचा मुद्दा’ घेऊन, राज ठाकरेंनी २००६ मध्ये ‘मनसे’ ची स्थापना केली त्याला आता १९ वर्ष झाली ..!! मराठीची परिस्थिती तीच आहे उलट अजुन बिकटच झाली आहे! ज्या बडव्यांच्या नावाने छाती बडवून राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते, त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बसत आहेत. त्यामागे कोणते राजकारण आहे हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता दुधखूळी नक्कीच नाही. आपल्याला भाषणाला टाळ्या पडतात परतुं मते पडत नाहीत ती का, याचा विचार करुन ते थकले आणि बडव्यांना शरण गेले, असे आम्ही म्हणायचे का ? मराठी माणसांबद्दल एवढे प्रेम होते तर का नाही उबाठा आणि मनसेच्या प्रमुखांनी मराठी तरुणांना व्यवसायात उतरण्यासाठी मार्गदर्शन केले ? स्थानिय लोकाधिकार समिती पुन्हा एकदा जोरात कार्यरत का नाही केली? मराठी तरुणांनी रस्त्यावर उतरायचे, फक्त आंदोलने करायची आणि यांनी एसीत बसून खिडकीतून मजा पाहायची, हेच यांचे मराठी प्रेम आहे.
वास्तव हे आहे की ‘मराठी तरुण कामधंद्याला लागणं’ हे उबाठा आणि मनसे या दोनही पक्षांना परवडणारं नाही. मराठी तरुणांच्या हातांना काम मिळालं तर यांची दुकानं बदं होतील. आजचा मराठी तरुण नक्की करतोय काय ..?? त्याला काय हवे आहे याच्याशी या नेत्याना देणे घेणे उरलेले नाही आणि कधीही देणे घेणे नव्हते. मराठी तरुणांची माथा भडकवून, त्यांचा वापर करुन, या दोन पक्षाचे नेते आपले स्वतःचे दुकान चालवत आहेत. या दुकांनाचे शटर बंद व्हायची वेळ आली म्हणून हे पुन्हा एकत्र येत आहेत. यांचे मराठी प्रेम हे पुतना मावशीचे मराठी प्रेम आहे. यांना फुटलेला मराठी प्रेमाचा पान्हा हा स्वार्थाच्या वीषाचा आहे. आपली अमृताहून गोड मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली गेली पाहिजे , मराठी भाषेचा जागर झालाच पाहिजे आणि हा जागर होणारच. पण त्याचा स्वतःच्या राजकारणासाठी , स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग करणे योग्य नाही. एकमेकांना ज्यांनी गेली दोन दशके सतत पाण्यात पाहिले ते आता एकमेकांना स्टेजवर शेजारी शेजारी पाहात आहेत तेंव्हा ते मनात एकमेकांची उणी दुणी काढत असतील. एकमेकांना सोबत घेऊन भाषेचे राजकारण करण्याशिवाय काही पर्याय त्यांच्याकडे उरलेला नाही !