महाराष्ट्र

Ratnagiri news: रत्नागिरीतील उबाठाचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर, उदय सामंतांच्या गौप्यस्फोटाने ठाकरेंच्या गोटात खळबळ

Ratnagiri news: रत्नागिरीतील शिवसेना ठाकरे गटातील एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय.

Ratnagiri news: विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Vidhan Sabha Election) शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) एका मागे एक धक्के बसले आहेत. राज्यभरातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) ‘जय महाराष्ट्र’ करत महायुतीतील (Mahayuti) घटक पक्षांमध्ये प्रवेश केलाय. आता रत्नागिरीच्या (Ratnagiri) राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. शिवसेना ठाकरे गटातील एक मोठा नेता भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. उदय सामंतांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाच्या गोटात मोठ्या खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

Ratnagiri news: ठाकरे गटाचे उमेदवार भाजपच्या वाटेवर?

उदय सामंत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “2024 च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहाय्यकामार्फत भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू आहेत,” असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.

इतकंच नव्हे, तर सामंतांनी आणखी धक्कादायक माहिती देताना सांगितले की, “पक्षप्रवेश करत असताना माझा अडथळा कुठे येऊ नये, यासाठी मला देखील निरोप पाठवले गेले आहेत,” असे देखील उदय सामंतांनी म्हटले आहे. उदय सामंतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Uday Samant on Local Body Election: आगामी निवडणुकांबाबत सामंतांची भूमिका स्पष्ट

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, “महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. योग्य वेळी आमचे तीन नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तो जाहीर करतील. त्यामुळे विधानसभेप्रमाणे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील मोठं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

उदय सामंत पुढे म्हणाले की, स्थानिक पातळीवर काही हेवेदावे असतील. त्यावरती देखील तोडगा काढण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार तिन्ही नेत्यांना आहे. या निवडणुका आमच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे आम्ही स्वबळाचा नारा देऊ शकत नाही. निवडणुका लढवताना सर्व विचार केला जाईल. त्यानुसारच निर्णय घेतला जाईल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button