Mumbai BEST Election: 24 तास आधी चौकशीची नोटीस, मग मतदारांच्या घरी पाचशेच्या नोटा असणारी पाकिटं पोहोचली; बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीपूर्वी रंजक घडामोडी, मनसेचे संदीप देशपांडे संतापले

BEST Election 2025: बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने 21 संचालकांना नोटीस पाठवल्या होत्या, त्यानंतर आता सहकार समृद्धी पॅनेलकडून पैसे वाटल्याचा आरोप
Mumbai BEST Election: राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी सोमवारी मुंबईत मतदान पार पडत आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. या निवडणुकीत बेस्ट कर्मचारी संघटनेतील तब्बल 15 हजार कर्मचारी मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) उत्कर्ष पॅनेलसमोर महायुतीच्या नेत्यांनी सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवले आहे. गेल्या 25 वर्षांपासून बेस्ट पतसंस्थेवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होते. या काळात पतसंस्थेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर मतदानाला अवघे 24 तास शिल्लक असताना दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 21 संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी नोटीस धाडली होती. यावरुन भुवया उंचावल्या असतानाच आता मतदानाच्या आदल्या दिवशी सहकार समृद्धी पॅनेलने मतदारांना बंद लिफाफ्यातून पैसे पाठवल्याची बाब समोर आली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले. (BEST employees co operative credit society Election news)
आज बेस्ट पतपेढीची निवडणूक होणार आहे. अनेक पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत अतिशय घाणेरडे राजकारण खेळले जात आहे. मतदारांना पैशांचं आमिष दाखवले जात असून त्यांच्या घरी पैसे पाठवले जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. दत्तात्रय पेडणेकर यांच्या घरी सहकार समृद्धीचे एक पॅम्प्लेट पाठवण्यात आले होते. या पॅम्प्लेटच्या आत एक पांढऱ्या रंगाचा लिफाफा होता. त्यामध्ये पाचशेच्या दोन नोटा होत्या. इतक्या घाणेरड्या पद्धतीने निवडणूक लढवली जात असतील तर आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे. आम्ही यासंदर्भात त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत. मात्र, बेस्टचे सगळे मतदार सुज्ञ आहेत, ते अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.




