शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात

जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसी म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे
छ. संभाजीनगर : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच (Bribe) घेण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. कारण, एसीबीच्या (ACB) धाडीत ग्रामसेवकापासून ते तहसीलदारांपर्यंत कारवाई केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यात महिला क्रीडा अधिकाऱ्यासही लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली होती, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) चक्क निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांस अटक करण्यात आली आहे. तब्बल 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने आरडीसी महोदयांना रंगेहात अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदाराकडे तब्बल 41 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसी म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकुनामार्फत ही लाच घेण्यात येत असताना अटक करण्यात आली असून विनोद खिरोळकर असं आरडीसींचं नाव आहे. वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठीपूर्वी या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल 41 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार, संबधित तक्रारदाराकडून 23 लाख रुपये घेतले होते. मात्र, तरीही 18 लाख पुन्हा मागण्यात आले होते. त्यातील 5 लाख रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली आहे. अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत ही लाच घेतली जात होती. या घटनेनं जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विनोद गोंडुराव खिरोळकर, पद निवासी उप जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजी नगर, याची घरझडती घेतली असता खालील प्रमाणे मौल्यवान मालमत्ता मिळून आली आहे.
1) रोख रक्कम-13,06,380/-
2) सोन्याचे दागिने – 589 ग्रॅम किंमत अंदाजे, 50,99,583/-
3) चांदीचे दागिने- 3 किलो 553 ग्रॅम किंमत 3,39,345/-
मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण किंमत- 67,45,308/- रुपये मिळून आले आहेत.
दिलासा देणारे महसूल विभागाचे निर्णय, पण भ्रष्टाचार बोकाळला
दरम्यान, एसीबीच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा महसूल आणि जिल्हा प्रशासनातील भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पडलं असून शासकीय फाईलवर वजन ठेवल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नाहीत. विशेष म्हणजे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत सर्वसामान्य व शेतकरी वर्गाला दिसाला देण्यासाठी चांगले निर्णय घेतले जात आहेत. त्यामध्ये, वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे. तर, आज आता फक्त 500 रुपयांमध्ये भाऊबंदकीची वाटणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महसूल खात्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये वाटणी करायची असेल तर एकूण रेडीरेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागायची. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ग्रामसेवक, तलाठी ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या भ्रष्टाचाराल कधी ब्रेक लागणार हा प्रश्न कायम आहे.