Beed Crime Jail Gang war: बीड कारागृह मारहाण प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडचं नाव वगळलं, चर्चांना उधाण

Beed Jail Walmik Karad: बीड जिल्हा कारागृहातील मारहाण प्रकरणात वाल्मीक कराडचे नावच नाही. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून सोनवणे वाघमोडेंवर गुन्हा दाखल
बीड: बीड जिल्हा कारागृहात सोमवारी वाल्मीक कराड व महादेव गीते समर्थकांच्या वादात वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचे सांगितले जात होते. आता कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून सुदीप सोनवणे व राजेश वाघमोडेंवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीत वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्या नावाचा उल्लेख मात्र करण्यात आलेला नाही.
बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते (Mahadev Gitte), राजेश वाघमोडे, राजाभाऊ नेहरकर, मुकुंद गीते यांच्यासह बनावट नोटा प्रकरण व गोळीबारातील आरोपी अक्षय आठवले (Akshay Athawale) व त्याचे सहकारी याच कारागृहात होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड. दर्शन घुले व इतर आरोपी बीड कारागृहातच आहेत.
सोमवारी महादेव गीतेच्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपी सुदीप सोनवणे व बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी राजेश वाघमोडे यांच्यात हाणामारी झाली. मात्र वाल्मीक कराड सुदर्शन घुले या दोघांना महादेव गित्ते टोळीकडून मारहाण झाल्याची चर्चा होती. यात अक्षय आठवलेने गित्ते गँगला मदत केल्याचे सांगितले गेले. यानंतर गित्ते गँगच्या चौघांना हरसुल कारागृहात स्थलांतरित केले गेले.
दरम्यान सोमवारी रात्री उशिरा कारागृहाचे शिपाई संतोष नवले यांच्या तक्रीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फोन करण्याच्या कारणावरून सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या तक्रारीत वाल्मीक कराड याचे नावच घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
कारागृह प्रशासनावर संशय
या सगळ्या प्रकरणात कारागृह प्रशासनाच्या भूमिकेबाबत शंका निर्माण झाली आहे. सुरुवातीला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, तुरुंग प्रशासनाने हा दावा फेटाळला होता. सुधीर सोनावणे आणि राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले होते. जर वाद या दोघांमध्ये झाला असेल तर त्यांना हलवणे अपेक्षित होते. परंतु, असे न करता गित्ते गँग आणि आठवले गँग यांनाच हटवण्यात आले. गित्ते गँगमधील चौघांना वाद झाला त्याचदिवशी तातडीने हर्सुलला हलवण्यात आले होते. तर आठवले गँगची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे वाद नेमका कोणात झाला, याबाबतचा संभ्रम कायम आहे.